साडे दहा वाजले तरी पंचायत समिती कार्यालयाचे दरवाजे बंदच, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभाराचा नागरिकांना त्रास

साडे दहा वाजले तरी पंचायत समिती कार्यालयाचे दरवाजे बंदच, 

अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभाराचा नागरिकांना त्रास 

परळी ( रानबा गायकवाड)   शासकीय कार्यालये आणि कर्मचारी यांनी वेळेवर कामावर यावे असा सक्त कायदा आहे.पण या कायद्याला धाब्यावर बसविण्याचे काम परळी पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी करतांना दिसत आहेत. सकाळचे साडे दहा वाजले तरी पंचायत समिती कार्यालयाचे दरवाजे बंदच असल्याचा पुरावाच जनतेसमोर आलेला आहे. 
   आज सकाळी साडेदहा वाजता परळी पंचायत समिती  कार्यालयाचे बाहेरील मुख्य गेट तसेच इमारतीचे मुख्य दरवाजा उघडलेला होता. परंतु आत मध्ये गेल्यानंतर तीन्ही मजल्यावरचे जवळपास सर्वच दरवाजे बंद दिसत होते. ना अधिकारी ना कर्मचारी. कर्मचारीच नाहीत म्हटल्यावर सामान्य नागरिक तरी आत मध्ये कोणाला भेटणार. आणि कार्यालयात कशाला जाणार.
   पंचायत समिती बाहेरील हॉटेलवर अनेक नागरिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसलेले पत्रकारांच्या निदर्शनास आले. राज्य सरकारने मुळातच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसाचा आठवडा केलेला आहे.
आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी दिलेली आहे. त्यामुळे उर्वरित पाच दिवसात येणाऱ्या नागरिकांची कामे करणे महत्त्वाचे आहे. परंतु वेळेवरच येणार नसतील तर नागरिकांचे कामे होणार कसे. त्यातही अनेक अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयाला नेहमी अनेक कारणे देऊन दांडी मारत असतात. 
   जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष देऊन लेट लतीफ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना वठणीवर आणण्याची आवश्यकता आहे. तरच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसू शकतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने