20 ऑगस्ट पासून परळी तालुक्यात जातीय सलोखा अभियानाची सुरुवात- उत्तम माने

20 ऑगस्ट पासून परळी तालुक्यात जातीय सलोखा अभियानाची सुरुवात- उत्तम माने 

परळी प्रतिनिधी.      सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेला जातिवाद आणि जातीजातीतील निर्माण झालेला तेढ लक्षात घेता सामाजिक सलोख्याची गरज लक्षात घेऊन येत्या 20 ऑगस्ट पासून परळी तालुक्यात सामाजिक सलोखा अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती उत्तम माने यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
      शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात जातिवाद आणि जातीय तेढ निर्माण होत आहे. परंतु भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा लढा लढला गेला पाहिजे. यामध्ये हा लढा कोणत्या एका जाती विरोधात किंवा गटाविरोधात नाही हे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. आणि अशा प्रकारचे गढूळ वातावरण कोणीही निर्माण करू नये.
      शेकडो वर्षापासून प्रत्येक गावागावात सर्व धर्माची माणसे गुण्यागोविंदाने राहत आहेत. अशाच प्रकारचे वातावरण कायम राहावे,
जातीजातीत निर्माण होणारा तीढा सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. यासाठी हे सामाजिक सलोखा अभियान परळी तालुक्यातील प्रत्येक गावागावात पोहोचणार आहे. गावकऱ्यांशी संवाद साधणार आहे. या अभियानात राजकीय जोडे बाजूला काढून प्रत्येक जण सहभागी होऊ शकतो असेही यावेळी उत्तम माने यांनी सांगितले. 
      या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर, काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे, शेतकरी संघटनेचे नेते अच्युतराव गंगणे,नारायण पांडे, नवनाथ तांदळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते महबूब कुरेशी, ज्ञानेश्वर फड, अमोल  वाघमारे आदी उपस्थित होते. दरम्यान जातिवादास नका देऊ थारा! सामाजिक सलोखा दृढ करा, जातीय सलोखा अभियान याचे महत्त्व पटवून देणारे 20000 पत्रके परळी तालुक्यात गावागावात वाटप करण्यात येणार आहेत .या पत्रकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने