परळी आणि धारुर तालुक्यात डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकीवर जातीयवाद्यांचा हल्ला

परळी आणि धारुर तालुक्यात डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकीवर जातीयवाद्यांचा हल्ला


परळी प्रतिनिधी.     महामानव ,विश्वरत्न, डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर जातीयवाद्यांनी हल्ला केल्याची घटना परळी तसेच धारूर तालुक्यात घडली असून या घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत.या घटनेने आंबेडकरी समाजातील संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा जाहीर निषेध करीत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे  माजी बीड जिल्हाध्यक्ष तथा आंबेडकरी समाजाचे ज्येष्ठ नेते रामदादा किरवले यांनी केली आहे. तर आमला येथील बौद्ध बांधवांना पोलीसांनी संरक्षण  देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे सचिन उजगरे यांनी केली आहे.
      याबाबत अधिक माहिती अशी की काल दिनांक 28 एप्रिल रोजी परळी तालुक्यातील एका गावात तर आमला ,तालुका धारूर येथील निघालेल्या डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीवर जातीय गाव गुंडांनी दगडफेक करून हल्ला केला.या घटनेत आमला येथील शितल सिद्धार्थ वारकड हिचे व अन्य एका पुरुषाचे जातीयवाद्यांनी केलेल्या दगडफेकीत डोके फुटले  असून अनेकां

ना मुक्का मार लागल्याचे समजते .तसेच अचानक मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीने समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे . दरम्यान यापूर्वी 1992 93 मध्ये सुद्धा अशाच प्रकारची आंबेडकर जयंती वर दगडफेक झाल्याची घटना घडली होती सदर प्रकरण कोर्टात चालू असल्याचे समजते. त्यामुळे गावचे पार्श्वभूमी पाहता पोलिसांनी अधिक पोलिस बंदोबस्त देण्याची गरज होती.
       याप्रकरणी अमला येथील प्रकाश मारुती गवळी  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलिसांनी आरोपी अशोक सोळंके ,पांडुरंग आबासाहेब सोळंके ,भागवत बाळासाहेब सोळंके,ऋषिकेश बळीराम सोळंके ,विशाल पुरुषोत्तम सोळंके ,सुरज बलभीम सोळंके ,नवनाथ वैजनाथ सोळंके ,कृष्णा हरिभाऊ सोळंके ,रतन आबासाहेब सोळंके. सर्व राहणार आमला ,तालुका धारूर यांच्या विरोधात कलम 323, 143, 547, तसेच 3(1) (r),3(1)(5),3(2)(va) ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या प्रकरणात  परळी ग्रामीण पोलीसांशी संपर्क साधला असता अद्याप गुन्हा नोंद झाला नसल्याचे माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या दोन्ही घटनेमुळे निवडणुकीच्या तोंडावर जातीवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा आंबेडकरी समाजातून जाहीर निषेध होत आहे .तसेच याप्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी आंबेडकरी समाजाचे ज्येष्ठ नेते रामदादा किरवले यांनी केली आहे . तर गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी .आणि दहशतीखाली असलेल्या बौद्ध बांधवांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी संरक्षण द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते सचिन वगैरे यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने