किस्से जाहिरातीचे भाग -3 घरात नाय म्हणून सांग....

किस्से जाहिरातीचे
भाग -3

           घरात नाय म्हणून सांग....

    एखाद्या व्यक्तीची जाहिरात छापल्यावर त्या जाहिरातीचे पैसे वसूल करणे हे आजकाल खूप अवघड झाले आहे.पूर्वी जाहिरात देणारे दिलेला शब्द पाळायचे व काही दिवसातच जाहिरातीचे पैसे पत्रकारांना देऊन टाकायचे.पण गेल्या काही वर्षांत हा ट्रेंड बदलला आहे. असाच एक गंमतीदार किस्सा काही वर्षांपूर्वी मी अनुभवला होता. तो वाचकांसाठी.

   माझे सुरवातीचे  साप्ताहिक दंडासाठी  मी एका प्राध्यापकांची जाहिरात घेतली होती.सदर जाहिरात छापल्यानंतर मी बीलासाठी त्यांना काही दिवसांनंतर भेटलो.ही घटना साधारण 1998- 99 ची आहे. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते.टेलिफोनचा वापर केला जात होता.मी दैनिक मराठवाडा साथीतून बाहेर पडल्यानंतर स्वतःचे साप्ताहिक दंडा नावाचे वृत्तपत्र चालू केले होते.याचे उद्घाटन दैनिक मराठवाडा साथीचे संपादक दिवंगत मोहनलाल बियाणी, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार प्रा. डॉ.कमलाकर कांबळे,प्रा.दासू वाघमारे, प्रसिद्ध साहित्यिक आबासाहेब वाघमारे, दिवंगत कवी डॉ.जी. एम. खान आदि मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत सिद्धार्थ नगर येथे संपन्न झाले होते.  डॉ. जी. एम. खान यांनी साप्ताहिक दंडावर खूप सुंदर असे कविता सादर केली होती.
    एकदा साप्ताहिक दंडासाठी मी एका प्राध्यापकांची जाहिरात घेतली होती.जाहिरात घेतल्यानंतर सहाजिकच काही दिवसांनंतर मी बीलासाठी त्यांना संपर्क साधला. प्रत्यक्षात भेटल्यावर त्यांनी मला काही दिवसांनंतर देतो असे सांगितले.मी वाट पाहिली.त्यांनी जो वेळ दिला होता त्यानंतर मी त्यांना भेटायचा प्रयत्न करत होतो.त्यावेळी माझ्याकडे कोणतेही वाहन नव्हते. आणि स्वतः चा टेलिफोन सुध्दा नव्हता.त्यामुळे कुणाला जर भेटायचे असेल तर पायी चालत जायचो व भेट घ्याची.
   काही महिने झाले.बील काही मिळाले नाही.असेच एकदा मी दुपारच्या दरम्यान त्यांच्या घराकडे निघालो.घराजवळच्या रस्त्या

वर येताच मी त्यांना घरात असल्याचे पाहिले.मनोमनी मला थोडे बरे वाटले चला आज बील भेटेल.मी घरी गेलो आणि गेटवर थांबून आवाज दिला.घरातून जाहिरातदार व्यक्तीच्या मंडळी बाहेर आल्या आणि मला म्हणाल्या,' सर घरी नाहीत' .मी स्तब्ध झालो.रस्त्यावरून मला तर ते घरात दिसले होते.पण मला या ताई नाही म्हणत आहेत.मी क्षणभर तसाच थांबलो.लक्षात आले आपणास भेटणे टाळण्यासाठी हा निरोप देण्यात आला. मी तसाच परत निघालो थोडा निराश होऊन.
    2001 मध्ये मी साप्ताहिक शिक्षण मार्गचे उद्घाटन केले. आणि या उद्घाटनाला परळीतील उद्योजक उत्तमराव देशमुख तसेच  जाणीवपूर्वक सदरील जाहिरात देणाऱ्या प्राध्यापकांनाही निमंत्रित केले होते. त्यांच्याबरोबर इतरही पाहुणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आणि साप्ताहिक दंडाचेही सूत्रसंचालन आमचे साहित्यिक मित्र  माझ्या पत्रकारितेत सुरवातीपासून आजतागायत सोबत असणारे अजयकुमार गंडले यांनी केले होते. साप्ताहिक शिक्षण मार्गच्या कार्यक्रमात प्रास्ताविक करीत असताना मी म्हणालो," जाहिरात हा वर्तमानपत्रांचा कणा आहे. परंतु जाहिरात घेतल्यानंतर बिलासाठी कधी कधी पत्रकारांना वाईट अनुभव येतात. असेच एकदा मी एका जाहिरातदारांच्या घरी गेलो. त्यांनी मला घरातून पाहिले. परंतु घरातून पत्नी मार्फत घरात नाही म्हणून सांग असा निरोप बाहेर धाडला.  मला नवल वाटले.असेही  अनुभव येत असतात."  तेव्हा उपस्थितांमध्ये हशा पिकला.
    माझ्या प्रस्ताविकानंतर जेव्हा सदरील पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आणि माझ्या जाहिरातीचे पैसे दिले नाहीत हे त्यांनाही माहित असलेले व्यक्ती भाषणाला उभा राहीली. आणि सुरुवातीलाच म्हणाली,' रानबा गायकवाड जे बोलले त्यापैकी मी मात्र नाही'  एकूणच कार्यक्रमात मात्र मलाच माहीत होते.  अशी घटना कोणासोबत घडली होती.व कोणी तसे केले होते.माझा निशाणा पक्का लागला होता. आणि बील जरी मिळाले नसले तरी कधीतरी त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात मी जाणीव करून दिली होती. हे त्यांच्याही लक्षात आले होते.

           रानबा गायकवाड
            7020766674

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने