परळीचा विकास आणि शांततेसाठी विधानसभा निवडणूक लढविणार - काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख

परळीचा  विकास आणि शांततेसाठी विधानसभा निवडणूक लढविणार - काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख 

परळी (प्रतिनिधी).    परळीचा सर्वागिण विकास, श्रीक्षेत्र प्रभु वैद्यनाथ  नगरीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच सर्वधर्मीय, सर्वसामान्य माणसाला सुख, समाधान, आनंदी व भयमुक्त वातावरणात जगता यावे, तसेच परळी शहर व मतदारसंघात शांतता, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण निवडणूक लढविणार आहोत अशी घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी मंगळवार दिनांक २३ जुले रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून केली.

    बीड जिल्ह्यात आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या खासदार सौ.रजनीताई पाटील, प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभा
ऊ पटोले, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहोत. लोकसभा निवडणुकीतील लक्षवेधी विजयानंतर महाविकास आघाडीवरील सर्वसामान्य जनतेचा विश्वास कायम आहे. हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. बीड जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे समविचारी पक्ष व संघटनेतील नेते आणि कार्यकर्ते यांचा ओढा वाढत आहे. अनेक जण काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत. काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुक पूर्ण ताकदीने लढविणार आहे. याचाच एक भाग म्हणून मी स्वतः परळी धानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी दिली. 
     ते पुढे म्हणाले की, बारामती, लातूर, पुणे शहराच्या धर्तीवर परळी शहरासह संपूर्ण मतदारसंघाचा विकास करणे आणि परळी शहर व मतदारसंघात शांतता, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण निवडणूक लढविणार आहोत. आपण निवडणूक लढवावी अशी परळी विधानसभा मतदारसंघातील सर्वधर्मिय ,मतदारांची आणि सर्वसामान्य माणसाची प्रामाणिक इच्छा आहे. त्यांच्या भावनेचा आदर करून तसेच परळीचा सर्वांगिण विकास, श्रीक्षेत्र प्रभु वैद्यनाथ यांच्या नगरीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहोत.  
      याबाबत मी व माझ्या सहकाऱ्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय नेत्या खासदार सौ. रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेशजी चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांना भेटून आपणांस उमेदवारी देण्याची विनंती केली आहे. तसेच परळी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला तिकीट मागणार असून याबाबत आपण महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार , माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे , प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, खा. सुप्रियाताई सुळे, खा. संजयजी राऊत यांच्यासह इतर नेत्यांची भेट घेऊन महाविकास आघाडी तर्फे अधिकृत उमेदवारी मागणार आहोत. मी विधानसभा निवडणूक लढवावी अशी परळी मतदारसंघातील सर्वधर्मिय लोकांची जनभावना आहे.

   सलग सत्तेत तरीही सत्ताधाऱ्यांनी परळीचा विकास केला नाही. परळी वैजनाथ हे सुप्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या शहरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. रेल्वे, वीज निर्मिती सारखे महत्त्वाचे प्रकल्प असूनही आज परळी शहरात कायद्याचे राज्य नाही. शिक्षणाच्या सोयी व रोजगार उपलब्ध नाही. अधिकारी,व्यापारी महिला, मुली, विद्यार्थी, अल्पसंख्यांक हे सर्व घटक आज दहशतीखाली जीवन जगत आहेत.  
     शहरातील श्रीमंत लोक अंबाजोगाई, लातूर, पुणे येथे कुटुंबासह स्थलांतरित झाले आहेत. शेतकरी अनुदान व पीक विम्यापासून वंचित आहेत.परळीत उद्योग, व्यवसाय प्रगतीपथावर नाहीत हे चित्र आता बदलले पाहिजे. नेहमीच परळीकरांच्या आशिर्वादावर मोठे झालेल्यांना सलग सत्तेत राहून ही परळीचा विकास करता येवू नये ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे यापूढे परळीचा सर्वारिण विकास व्हावा, श्रीक्षेत्र प्रभु वैद्यनाथ यांच्या नगरीला गतवैभव मिळावे, सर्वधर्मिय नागरिक, सर्वसामान्य माणस यांना सुख ,समाधान, आनंदी व भयमुक्त वातावरणात समृद्ध जीवन जगता यावे, परळी मतदारसंघातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व नागरिकांना अद्ययावत आरोग्य सेवा, सुविधा उपलब्ध व्हावी, जनसेवेच्या सर्वच क्षेत्रात परळी शहराचा नांवलौकिक व्हावा, शहरासह मतदारसंघात शांतता, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण परळी मतदारसंघातील लोकांच्या प्रेमापोटी, लोकभावनेचा आदर करून विधानसभा निवडणूक लढविणार आहोत. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई व विविध पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने